ठाणे: परस्परविरोधी विचारांची शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत आणखी एक राजकीय चमत्कार घडला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या ४ नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलं आहे. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ झाली आहे. ‘कोणार्क’च्या प्रतिभा पाटील निवडून आल्या आहेत.
दरम्यान उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. इमरानवल्ली यांना एकूण ४९ मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना ४१ मतं मिळाली. शिवसेनेचे फक्त १२ नगरसेवक असतानाही राज्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे ४१ चा आकडा गाठणं त्यांना शक्य झालं.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
- काँग्रेस – ४७
- शिवसेना – १२
- भाजप – २०
- कोणार्क विकास आघाडी – ४
- समाजवादी पार्टी – २
- आरपीआय (एकतावादी)- ४
- अपक्ष – १
