ठाणे : मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील महानगर पालिकेत देखील शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईप्रमाणेच या शहरातील पायाभूत सुविधांची अवस्था देखील देखील बकाल झाली आहे. अगदी रोजच्या प्रवासात सामान्य शहरवासीयांचा अर्धा वेळ या प्रवासातच निघून जातो. त्यात खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलं असून प्रवासात एखाद्याचा जीव जाण यात काहीच नवीन उरलेलं नाही. मुंबई, ठाणे. कल्याण-डोंबिवली या शहरांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं देखील म्हणणं आहे.

दरम्यान, ठाण्यामधील गायमुख येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी घोडबंदर रोड येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण सोहळा पार पडला. आदित्य ठाकरे यांनी इतरही काही विकास कामांचे भूमिपूजन केले. परंतु ठाण्यात आलेल्या आदित्य ठाकरेंना रस्त्यांवरील खड्ड्यांचा आणि त्यामुळे झालेल्या वाहतुककोंडीचा चांगलाच फटका बसला. आनंदनगर टोल नाक्यावर आदित्य ठाकरेंचे स्वागतच खड्डे आणि वाहतुककोंडीने झाले. अगदी घोडबंदर रोडवरही अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंचा ताफा खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतुककोंडीत अडकल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाण्यातील खड्यांचे खापर आदित्य ठाकरेंनी मेट्रो प्रशासनावर फोडले आहे.

तिनहात नाका, कापूरबावडी तसेच घोडबंदर रोडवर अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्या वाहतुककोंडीत अडकल्याचे पहायला मिळाले. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी ‘मेट्रोच्या कामांसहीत अनेक ठिकाणी एकाच वेळी विकासकामे ठाण्यात सुरु आहेत त्यामुळे वाहतुककोंडी होताना दिसते,’ असे मत नोंदवले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमीपूजन आदित्य ठाकरे यांनी केले. गायमुखमधील चौपटीबरोबरच इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. तसेच कासारवडवली येथील ठाणे महानगरपालिकेच्या आगरी- कोळी (आदिवासी) भवनाचा भूमिपूजन सोहळा आणि मानपाड्यातील वनस्थळी उद्यान लोकार्पण सोहळाही आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडला.

तत्पूर्वी २०१७ मध्ये लाखो रुपये खर्चून कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली ‘ओपन जिम’ चक्क गायब झाली होती. त्यावेळी महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड झाला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, पालिका आयुक्त ई. रविंद्रन यांच्यासह शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठय़ा थाटामाटात आणि गाजावाजा करून या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले होते.

तसेच यावर्षीच्या सुरुवातीला सिटी पार्कच्या भूमिपूजनासाठी कल्याणमध्ये आलेल्या युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत लवकरच हवाई रिक्षा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर कल्याणकर नागरिकांनी खिल्ली उडवली, याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून, सोशल मीडियावर चांगलेच टीकास्त्र सोडण्यात आले होते.

कल्याण शहरात येण्यासाठी पत्रीपूल, दुर्गाडी पूल, शहाड उड्डाणपूल, वालधुनी ब्रिज हे प्रमुख एन्ट्री पॉइंट असून, या सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. शहरात येतानाच ट्राफिकने स्वागत होत असल्याने, कल्याणमध्ये येण्यास कोणीही उत्सुक नसते. दिवसातील बराचसा वेळ हा वाहतूक कोंडीत जात असल्याने चाकरमानी हे जेरीस आले आहेत. स्टेशन परिसराला देखील बकालपणा आला असून, बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षांमुळे आणि एसटी डेपोत येणा-या बसेसमुळे स्टेशन परिसरात देखील मोठी वाहतूक कोंडी होत असते. यावर तोडगा म्हणून स्टेशन परिसरात सॅटीस प्रकल्प राबविणे अपेक्षित असताना सत्ताधा-यांनी मात्र, स्टेशन परिसरात स्कायवॉक उभारत जनतेच्या पैशांचा निव्वळ चुराडा केला. शहरातील अनेक अंतर्गत रस्ते खराब असून, २७ गावांत तर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

ठाण्यात आदित्य ठाकरेंचा ताफा खड्ड्यांमुळे वाहतुककोंडीत अडकला; खापर फोडलं मेट्रो प्रशासनावर