ठाणे: व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. याची विरोधी पक्षांकडून प्रचंड नाराजी वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने देखील सरसावली आहे. लोकसभा मत मोजणीच्या दिवशी ठाण्यातील मोबाईल टॉवर बंद ठेवावेत अन्यथा मतमोजणी केंद्रामध्ये जॅमर बसवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे केली आहे.
तसेच मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींना सक्तीची मोबाईल बंदी करण्यात यावी, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनी किंवा वॉकीटॉकी सेवा वापरण्यात यावी अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे. व्हीव्हीपॅट मशीन लावले गेले आणि त्यावर चित्र देखील दाखवले गेले. पण या ईव्हीएम मशिनमधील चिठठ्याच मोजायच्या नसतील तर त्या मशिनचा उपयोग काय? असा सवाल जाधव यांनी केला. तसेच हे नाटक न समजण्याइतकी जनता अडाणी नसल्याचेही ते पुढे म्हणाले.
ईव्हीएम संदर्भात असलेल्या कोणत्याही तक्रारींचे नागरिकांना समाधान होईल असे उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही. याबाबत आम्ही अनेक पत्र महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिलेली आहेत. पण त्याचे साधी पोच देण्याचे सौजन्य निवडणूक आयोगाने दाखवलेले नाही. याचाच अर्थ निवडणूक आयोग किती निर्ढावलेले आहे हे स्पष्ट असल्याची टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
