महाड : मार्च महिना ओलांडताच उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु आता पाणी स्त्रोतांंवर त्याचा परिणाम होत असून पाण्याची पातळी देखील खाली जाऊ लागल्याने महाड तालुक्यावर प्रचंड पाणी टंचाईचे सावट पसरू लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक नेत्यांना सामान्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नाही आणि त्यामुळे नागरिक देखील हवालदिल झाले आहेत.
महाड तालुका हा भौगोलिकदृष्टया दर्याखोर्यांनी व्यापलेला आहे. परिणामी येथे सरासरी पाऊस मुबलक पडत असला तरी बहुतांशी पाणी वाहून जात असल्याने दरवर्षी पाणी टंचाई जाणवत आहे. यातच औद्योगिकीरणामुळे प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण, पाणी स्त्रोतांंकडे झालेले दुर्लक्ष, प्रलंबित धरणे आणि लोकप्रतिनिधी व शासन तथा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. चुकीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या जलयोजना फोल ठरल्या आहेत. या योजनांवरील करोडो रुपये वाया गेले आहेत. आजही तालुक्यातील धरणे पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहेत. नदी, विहिरी, तलाव आदी पाणी स्त्रोतांतील गाळ उपसा न झाल्याने पाणी साठवणुकीची पातळी कमी झाली आहे.
रासायनिक प्रदूषणाने नदी नाल्यांचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. यातच सतत तापमानात वाढ होत असल्याने जलद बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. यामुळे तालुक्यातील काही गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. एकंंदरीत माहितीनुसार अकरा गावं आणि वाड्यांचे प्रस्ताव महाड पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.
