कल्याण: एका बाजूला राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ तब्बल दोन आठवडे सलग सुरु असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या बाबतीत मात्र एक अपवादात्मक प्रकार पाहायला मिळत आहे. आज अपक्षांपासून एक-एक आमदाराच्या समर्थनाचा भाव वाढलेला असताना मनसे आमदार राजू पाटील यासर्व राजकीय बाजाराकडे दुर्लक्ष करत जोरदारपणे कल्याण-डोंबिवली शहरातील मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवरील प्रशासकीय पाठपुरावा करू लागले आहेत.
त्यानुसार त्यांनी डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा आराखडा रेल्वेकडे सादर केला आहे. या आराखड्याला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे. कोपर रेल्वे उड्डाणपूल, लोकग्रामचा पादचारीपूल, पत्रीपूल आणि डोंबिवली स्थानकातील पादचारीपूल यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेचे एडीएमआर एस.आर.कक्कड यांची भेट घेतली.
कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने रेल्वेच्या आदेशानुसार महापालिकेने बंद केला. त्याच्या दुरुस्तीचा आराखडा १७ ऑक्टोबरला महापालिकेने रेल्वेकडे पाठविला. मात्र, रेल्वेकडून त्याला मंजुरी देण्यात दिरंगाई होत असल्याने पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा मंजूर केला जाईल असं आश्वासन दिल आहे.
तसेच कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल देखील सध्या बंद करण्यात आला आहे. सदर पूल महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्टसिटीचे अधिकारी आणि रेल्वेप्रशासन यांची आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यासोबत कल्याण-शीळ रस्त्यावरील कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. सदर पुलाचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण केलं जाईल असे देखील प्रशासनाने सांगितले आहे. मात्र मागील काही काळापासून एकूण कामाची गती अत्यंत संथ असल्याचं आमदार राजू पाटील यांनी निदर्शनास आणून ते काम पूर्ण करण्याचं ध्येय कसं गाठलं जाणार यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर सदर विषयाला अनुसरून एमएसआरडीसी, रेल्वे, महापालिका यांच्यासोबत आमदारांची संयुक्त पाहणी केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र मनसेचे आमदार राजू पाटील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरसावल्याचे पाहून भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी घाईगडबडीत निवेदनं देण्यास सुरुवात केली, मात्र एवढी वर्ष ते झोपले होते का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरम्यान, या बैठकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांच्यासोबत मनसे कामगारसेनेचे जितेंद्र पाटील, केडीएमसी’तील मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, हर्षद पाटील आणि मनोज घरत देखील उपस्थित होते.
