नवी मुंबई : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

कारण नवीन मुंबईतील एनसीपीचे तब्बल १३ नगरसेवक आणि अनेक महत्वाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे नवी मुंबईतील एनसीपीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. नवी मुंबई हा एनसीपीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर एनसीपीचे स्थानिक प्रतिनधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक गट भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी बैठकांवर बैठकांचा धडाका लावत असून ते १५ ऑगस्टपूर्वी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करत आहे. परंतु कॉंग्रेस आघडीच्या नेत्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण दिवसा अखेर कोणीतरी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. एक बाजूला भाजपला शह देणारी रणनीती आखायची आहे तर दुसऱ्या बाजूला पक्ष सोडून जाणारे नेते सांभाळायचे आहेत. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच दमछाक होत असल्याच दिसत आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, १३ नगरसेवक व अनेक पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर