ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भारतीय जनता पक्षालाच प्रतिप्रश्न केला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा यावेळी भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादन राज्य सरकारने शहरात स्टॉल स्थापन करून विकण्याची परवानगी दिली आहे. भाजीपाला विकू शकतात मग आंब्यानं काय घोडं मारलं होतं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जर शेतकऱ्यांना थोडे पैसे त्यात मिळत असतील तर त्यांना विकू देत नाही. भाजीपाला विकू देत, भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय असंही राज यांनी सांगितले.
