नवी दिल्ली : चीनने आता भारताला डिवचण्यासाठी नव्या कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तिबेटमार्गे भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्यात आल्याचे समजते. चीनच्या या निर्णयामुळे चीनच्या सीमेवर लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात दुष्काळाचं मोठं सावट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
या गंभीर विषयाला अनुसरून अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी केंद्रीय जलसंधारन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना यासंदर्भात लेखी पत्र व्यवहार करून अवगत केल्याचे समजते. चीन मधून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीचे तिबेटमार्गे येणारे पाणी अडविल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तुतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट याठिकाणी प्रचंड मोठ्या दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे असं त्यांनी लेखी पत्रात म्हटलं आहे. तसेच, या मुद्यावर अर्जुन राम मेघवाल यांच्यासह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी सुद्धा लावून धरली आहे.
विषय गंभीर असल्याने अरुणाचल प्रदेशातील प्रशासनाने सियांग जिल्हा प्रशासनामार्फत येथील नदीच्या भागातील स्थानिक जनतेला अलर्ट जारी केला आहे. विशेषकरुन मच्छिमार व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, शेजारी राष्ट्र चीनने ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अचानक सोडले तरी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता उद्भवू शकते असं म्हटलं आहे.
