लाहोर : पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणाऱ्या भारतीय समर्थकांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. कारण पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारतीय चित्रपट आणि मालिकांवर बंदीचा घालण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने भारतीय मालिका आणि चित्रपटांवरील बंदी हटवली होती. परंतु, या आदेशामुळे बॉलिवूडला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, युनायटेड प्रोड्युसर्स असोसिएशनने पाकिस्तानच्या स्थानिक टीव्ही चॅनल्सवरील परदेशी मालिकांबाबत एक याचिका पाकिस्तान सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्याच याचिकेवर शनिवारी सुनावणी दरम्यान पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब मियाँ यांनी हे आदेश जारी केले आहेत. परंतु धक्कादायक म्हणजे सुनावणी दरम्यान एका भलत्याच विषयाचा संदर्भ या याचिकेशी जोडण्यात आल्याचे वृत्त आहे. जर ‘सिंधू नदीवर धरण बांधण्यापासून ते आपल्याला रोखू शकतात तर आपण सुद्धा भारताच्या चित्रपटांवर बंदी का घालू शकत नाही?’, असा सवाल सुद्धा न्यायमूर्ती. साकिब मियाँ यांनी आदेश देताना विचारला.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये सुद्धा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने पाकिस्तानच्या स्थानिक टीव्ही तसेच एफएम रेडिओवर भारतीय मालिकांचं प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश जारी केले होते. भारतातून पाकिस्तानी कार्यक्रम तसेच पाकिस्तानी कलाकारांवर प्रतिबंध घालण्यात आल्यानंतर हे आदेश काढण्यात आले होते. परंतु, नंतर पाकिस्तान सरकारला भारतीय मालिका आणि सिनेमांबाबत आक्षेप नसल्याचं सांगत, २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने ती बंदी उठवली होती.

Pakistan supreme court has banned indian movies and indian tv serials in pakistan