पुणे : निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना लगेच राम आठवतो, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि एनसीपी’ची आघाडी होणारच आहे, असे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कामगार परिषदाच्या दरम्यान आणि खास दिवाळीच्या तोंडावर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, या वेळी त्यांच्यासोबत पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, योगेश बहल, नाना काटे, विशाल कलाटे, प्रशांत शितोळे, फजल शेख ही नेतेमंडळी सुद्धा उपस्थित होती.
यावेळी पवारांनी शहारातील कायदा आणि सुव्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, पवना थेट जलवाहिनी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी, निविदा प्रक्रियेतील ‘रिंग’ या शहरातील मूलभूत प्रश्नांचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील फडणवीस सरकार अपयशी ठरल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, स्वतः शिवसेनाच ‘भाजप’वर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, तरी भाजपचे सर्व नेते शांत आहेत. त्यांना प्रत्युत्तर दिले जात नाही किंवा कारवाईदेखील होत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे शिवसेनेसोबत युती केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळविणे शक्य नसल्याची भीती भारतीय जनता पक्षाला वाटते आहे. त्यामुळेच भाजपचे नेते सेनेच्या विरोधात बोलण्याचे किंवा प्रतिउत्तर देण्याचे टाळतात असं ते म्हणाले. केवळ निवडणुका जवळ आल्यावर जाणीवपूर्वक राममंदिराचा भावनिक मुद्दा बाहेर काढला जातो आणि समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न होतात असं अजित पवार म्हणाले.
