मुंबई : आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
व्यंगचित्रात “अभ्यंगस्नान” असा मथळा देऊन राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांना वाट करून दिली आहे. या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या प्रथेप्रमाणे अंघोळीच्या आधी तेल लावून घेत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी एक कार्यकर्ता येऊन फडणवीसांच्या कानात विचारतो साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का? दुसरीकडे खिडकीत लोकांची गर्दी जमलेली दाखवली आहे.
फडणवीस हे भाषणात कायम थापा मारत असतात असा आरोप राज ठाकरे नेहमीच करत असतात आणि त्यामुळे विविध समस्यांनी संतप्त झालेली महाराष्ट्राची जनता त्यांचा दिवाळीच्या दिवशी म्हणजेच अभ्यंगस्नान करताना समचार घ्यायला आली आहे, असे हे व्यंगचित्र आहे. राज ठाकरेंचे बोलणे जेवढे तिखट आहेत तसेच त्यांच्या कुंचल्याचे फटकारे सुद्धा जिव्हारी लागणारे आहेत. दिवाळी निमित्त राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांची मालिकाच फेसबुक आणि ट्विटरवर आणली जाणार आहे. या मालिकेत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस हे केंद्रस्थानी असतील असं राजकीय जाणकारांना वाटत आहे.
काय आहे ते नेमकं व्यंगचित्र?
