मुंबई : मुंबई महापौर बंगल्यात “दिवाळी संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावरील ही शेवटची “दिवाळी संध्या” असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाला महापालिकेतील अधिकारी, नगरसेवक आणि अनेक पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
परंतु, शिवाजी पार्क येथील बंगल्यावर आता स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक प्रस्तावित आहे. दरम्यान, लवकरच महापौरांना सुद्धा हा बंगला सोडून मुक्काम राणीच्या बागेतील बंगल्यात हलवावा लागण्याची शक्यता आहे. मात्र या पूर्वनियोजित कार्यक्रमाची सुरुवात स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडकेंनी गायलेल्या गाण्याने सुरुवात केली आणि उपस्थितांना हसू आवरेना झालं.
कारण, शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी “उद्धवा, अजब तुझे सरकार!” या गाण्याने सुरुवात करून मनातील दाटून आलेल्या भावना तर व्यक्त केल्या नाहीत ना अशी कुजबुज उपस्थितांमध्ये रंगली होती. कारण शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांचं नाव सुद्धा उद्धव आणि मुंबई महापालिकेत सुद्धा शिवसेनेचं सरकार असल्याने, यशवंत जाधव यांनी ठरवून तर हे गाणं गाण्यास सुरुवात करून स्वतःच्या भावना तर व्यक्त केल्या नाहीत ना? अशी चर्चा रंगल्याचे पाहावयास मिळाले.
