मुंबई : राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे. दरम्यान, झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी ठाणे, पालघर पासून ते थेट भुसावळ जिल्ह्यातील बळीराजा आणि आदिवासी समाज एकवटला आहे.
तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ढोल ताशाच्या गजरात हेलिकॉप्टरने शिवनेरीवर मातीचा कलश घेण्यासाठी पोहोचले आहेत. येत्या २४ आणि २५ तारखेला उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा मूळ उद्धेश हा लोकसभेच्या तोंडावर केवळ धर्माचं राजकरण करणे हाच आहे, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. सत्ताधारी सध्या धार्मिक मुद्यांवर केंद्रित झाले असून दुष्काळाने ग्रासलेला बळीराजा पूर्णपणे बाजूला पडला आहे. वास्तविक ग्रामीण महाराष्ट्रात दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. परंतु, भाजप-शिवसेना सरकार सध्या धर्म आणि नामांतराच्या राजकरणात मूळ गंभीर विषयांपासून सामान्यांना विचलित करत आहेत, असंच म्हणावं लागेल.
