दिल्ली : देशभरातला बळीराजा संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, शेतकरी पेंशन, दुष्काळ, विमा, जमिनीचे हक्क अशा अनेक प्रश्नांसंदर्भात मोदी सरकारला जाग आणण्यासाठी राजधानी दिल्लीत २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज दिल्लीच्या रामलीला मैदानात देशभरातील बळीराजा दाखल होणार असून उद्या हा मोर्चा थेट संसदेवर धडकणार आहे, त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहेत.
संपूर्ण देशभरातून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली तब्बल १८० संघटनांच्या सहभागातून तब्बल १ लाख शेतकरी या भव्य किसान मोर्चामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध आणि गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र आयोजित करावे, अशी मागणी सुद्धा या मोर्चामध्ये करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, या मोर्चासाठी अखिल भारतीय किसान सभेचे जवळपास २०,००० शेतकरी देशभरातून याआधीच रवाना झाले असून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे ५,००० शेतकरी सुद्धा येथे दाखल होणार आहेत अशी माहिती आहे.
आज सकाळी अकरा वाजता दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचे एकूण चार मोर्चे निघतील आणि संध्याकाळी सहा वाजता इथल्या रामलीला मैदानात दाखल होतील. याच रामलीला मैदानात “एक शाम किसान के नाम” हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल असे आयोजकांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तसेच उद्या म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी सकाळी रामलीला मैदानातून हा भव्य मोर्चा संसदेवर धडकणार आहे.
