गांधीनगर : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण क्षमते ना क्षमते तोच गुजरात भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मागील अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये पाटीदार समाजाची आंदोलनं सुरु आहेत. त्यात आता गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी लेखी मागणी ओबीसी आयोगाकडे केल्याचे वृत्त आहे. त्यामुळं आता गुजरातमध्ये सुद्धा पाटीदार समाजानंतर ‘समस्त गुजरात ब्राह्मण समाजानं’ ओबीसी कोठ्यातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्या मागणीनुसार ओबीसी कोट्यातून समस्त ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि त्यासाठी आमच्या समाजाचा सर्व्हे केला जावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आल्याचे समजते.

गुजरातमध्ये जवळपास साठ लाख ब्राह्मण आहेत. तसेच हा आकडा गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या ९.५ टक्के इतका आहे. त्यापैकी जवळपास ४२ लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे, गुजरात राज्य सरकारनं अधिकृत सर्व्हे करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावं, अशी थेट लेखी पत्राद्वारे मागणी समाजाचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली केल्याचे समजते.

दुसऱ्याबाजूला राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा ओबीसी आयोगाच्या सदस्यांची खास भेट घेतल्याचे समजते. त्यांच्या मागणीनुसार राजपूत समाजाला देखील ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी या मागणी संघटनेचे नेते राजन चावडा यांनी आयोगाला दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे. कारण राजपुतांना सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यामुळे या समाजाला मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. आणि राज्यातील इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच नगण्य असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळं आम्हाला सुद्धा आता ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी त्या समाजाची इच्छा असल्याचं त्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

guajarati brahmin communities have asked to obc commission for additional reservation quota