मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा पार पडली. दरम्यान, केंद्रात सत्तेवर आल्यावर आरएसएस’ला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तरच त्यांच्याशी आम्ही युती करू असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या सभेत केला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभा ही राज ठाकरे यांच्या मनसे गुढीपाडवा आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे भव्य होते. परंतु, सभेला करण्यात आलेला एकूण खर्च आणि आधुनिक उपकरणांचा वापर पाहून या सभा सत्ताधाऱ्यांनी पुरस्कृत केलेल्या नाहीत ना अशी शंका व्यक्त केली आहे. कारण, संबंधित पक्ष कुठेही सत्तेत नसताना राज्यभर एवढं मोठं अर्थकारण कसं करू शकतो अशी अनेकांनी पडद्याआड प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस वर देखील टीकास्त्र सोडलं. भाजप जहाल हिंदुत्ववादी आहे तर काँग्रेस स्वताला सौम्य हिंदुत्ववादी समजते त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आम्ही मानतो. आमचे भांडण किती जागा मिळाव्यात यासाठी नाही, काँग्रेस तसा प्रचार करीत आहे. आमचे भांडण तत्वाचे आहे. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी आणि संविधानविरोधी असलेल्या संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची हमी द्यावी आम्ही त्यांच्या बरोबर निवडणूक समझोता करायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. काँग्रेस, शिवसेना किंवा भाजप यांच्याकडून निवडणूक लढविणाऱ्या बांधकाम व्यावसायिक उमेदवाराला मतदान करु नका असे आवाहन आंबेडकर यांनी केले. कारण मुंबईतील कोळीवाडे व गावठाणे यांच्या जमिनीवर लक्ष्य असल्याचा आरोप देखील केला.
एमएमआयचे अध्यक्ष खासदार असदुददीन यांनी मोदींवर तसेच भाजपवर सडकून टीका केली. तसेच ७० वष्रे सत्ता भोगणारे काँग्रेस सुद्धा मुसलमानांच्या अधोगतीला कारणीभूत आहेत असा आरोप केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला. या हल्लाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
