मुंबई : शिवसेना नेत्या व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये मुंबईतील खड्ड्यांच्या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान महिलांप्रति अपमानास्पद भाष्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहरातील खड्डयांसंदर्भात भाष्य करताना नगरसेविका बरगळल्या की, खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून आजही रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत आहेत.मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा, परंतु बाईच्या गालाइतके ते रस्ते गुळगुळीत नका करू, अन्यथा पाय घसरेल असे महिलांप्रती अपमानास्पद विधान नगरसेविका विशाखा राऊत यांनी थेट स्थायी समितीच्या चर्चेदरम्यान केलं आहे.
बुधवारी मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रविराजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडून खड्डय़ांबाबत अहवाल मागितला. त्यावेळी आक्रमक झालेल्या अनेक नगरसेवकांनी आपल्या विभागातील खड्डय़ांचे प्रश्न मांडत मुंबई महानगर पालिका प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. ज्या खड्ड्यांमुळे अनेकांनी प्रवासादरम्यान स्वतःचा जीव गमावला अशा नाजूक विषावर जेव्हा मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीत चर्चा सुरु होते, तेव्हा सुद्धा शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांना थट्टामस्करी सुचली आणि ही मुंबईकरांची निव्वळ थट्टा असल्याची चर्चा मुंबई महानगर पालिकेत रंगली असून सामान्यांकडून त्या बद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांच्या या विधानानंतर सत्ताधारी मुंबईतील बकाल रस्त्यांच्या विषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येत आहे. याच स्थायी समिती करोडो रुपयांचे प्रस्ताव मंजूर होत असतात आणि तेच जनतेचे करोडो रुपये मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यात लुप्त होतात हे दरवर्षीचे रडगाणे झाले आहे. मुंबई खड्डयांसंदर्भात चर्चा सुरु असताना सुद्धा त्यांना थट्टा सुचली आणि खड्डे बुजवा, पण रस्ते इतकेही गुळगुळीत करू नका की कोणाचा पाय घसरेल. अशा लोक प्रधिनींवरून मुंबईकरांचा भविष्यकाळ किती अवघड आहे याचा प्रत्यय येत आहे असच म्हणावं लागेल.
