
Electricity Bill | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकारपुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.
महावितरण पुढील महिन्यात वाढ करणार
सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास ४० हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.
फडणवीस यांचा सातत्यानं युटर्न
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सातत्यानं युटर्न घेतात असा आरोप या व्हिडीओच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शेकडो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. pic.twitter.com/iuBbc5Hdoz
— Supriya Sule (@supriya_sule) November 23, 2022
कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याचा धडाका
वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याचा धडाका महावितरणने लावला होता. हा धडाका थांबवावा, अशी मागणी लाखो शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी करत होते. एकीकडे बळीराजा अतिवृष्टीने संकटात सापडलेला असताना, प्रचंड नुकसान झालेलं असताना बळीराजाने वीजबिल कसं भरायचं?, असा सवाल शेतकरी विचारत होते. अस्मानी संकट उभं ठाकलेलं असताना शासनाने अशा काळात वीजबिलांचा तगादा लावू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते. याच पार्श्वभूमीवर वीजबिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.