मुंबई : मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेत अनेकांचा नाहक जीव गेला आणि त्यात अनेक मुंबईकर गंभीर जखमी देखील झाले. मात्र काही मिनिटाच्या अंतरावर असून आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेतील ना जखमींची भेट घेतली ना मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जवाबदारी किंवा संवेदनशीलपणा मुंबईकरांप्रती व्यक्त केला नाही.

देशात आणि राज्यात सत्तेला चिटकून आणि टिकून राहण्यासाठी उद्धव ठाकरे थेट गुजरातला पोहोचल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यावेळी आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली. त्याआधी आयोजित विजय संलल्प सभेत घटकपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता.

‘मी येथे कसा काय आलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज आमच्याकडे आणि तुम्हा मतदारांकडे आहे’, असं सांगत मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावत आम्ही एकमेकांशी भांडत असल्याचा अनेकांना आनंद होत होता. आमच्यात मतभेद नक्की होते, पण भेट झाल्यानंतर सगळं मिटलं. सर्व वाद आम्ही संपवले आहेत असं सांगितलं.

आमची विचारधारा एकच आहे. हिंदुत्त्व आपला श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचं कसं ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘असं म्हणतात हात मिळाले, पण मने मिळाली नाही तर काय फायदा…आमची मने जुळली आहेत. गेल्या पाच वर्षात जे काही झालं ते झालं असा विचार आम्ही केला. गेल्या २५ वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही अस्पृश्य होतो’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Shivsena chief udhav thackeray on gujarat tour for amit shah loksabha rally at Ahmadabad