लातूर : लातूर येथील औसा येथे मंगळवारी महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान नवमतदारांना मत देण्याचे आवाहन करताना पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या नावाचा वापर केला. दरम्यान नवमतदारांना आवाहन करताना मोदी म्हणाले, तुम्ही तुमचे मत देताना प्रथम देशाचा विचार करा, मत देताना कोणतीही चूक करू नका, तुमचे पहिले मत हे पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना समर्पित करा, शहिदांचे बलिदान लक्षात ठेऊन मत द्या’ असे मोदी यावेळी म्हणाले.
लातूर आणि उस्मानाबादच्या उमेदवारांसाठी मोदी लातूरमध्ये प्रचार करण्यासाठी आले. भाजपा-शिवसेना युतीनंतर उद्धव ठाकरे आणि मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी नवमतदारांना मत मागण्यासाठी आवाहन करताना सैनिकांच्या नावाचा वापर केला. ‘तुम्ही कमळचे बटण दाबा, धनुष्यबाणसमोरील बटण दाबा, तुम्ही दिलेले प्रत्येक मत हे मोदींच्या खात्यात जाणार’ असेही ते पुढे म्हणाले. भाषणादरम्यान मोदींनी बालाकोट, पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक या मुद्यांचा उल्लेख केला. ‘आतंकवाद्यांना आम्ही घरात घुसून मारू. ही नव्या भारताची निती आहे. आंतकवादाचा नाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’ असे मोदी यावेळी म्हणाले.
