मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ २ सभा घेतल्या असून त्यातील पहिली सालाबादाप्रमाणे आयोजित होणारी गुडीपावडव्याची सभा आणि दुसरी नांदेडमध्ये झालेली विराट सभा. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणात केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच नेते विशेषकरून लक्ष होत आहेत. ज्यांच्यानावावर भाजप राज्यात मत मागत आहेत तेच पुराव्यानिशी उघडे पडत असल्याने राज्य भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचाच प्रत्यय म्हणजे विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या सभांसाठी होणाऱ्या खर्चावरून निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र असच म्हणावं लागेल. वास्तविक ते विनोद तावडे यांच्या नावे जरी केलं गेलं असेल तरी यांचे मूळ करविते धनी हे केंद्रातीलच आहेत, ज्यांना थेट राज ठाकरेंना लक्ष करता येत नाही. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर छोटे मोठे राज्यातील नेतेमंडळी देखील राज ठाकरेंना लक्ष करून, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विषयावरून त्यांना विचलित करू पाहत आहेत. मात्र राज ठाकरे सध्या राज्यातील नेत्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत मोदी आणि अमित शहांना लक्ष करत असल्याने राज्यातील नेत्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसते. त्यात राज ठाकरेंच्या मूळ प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी ‘राज ठाकरे दुसऱ्याच्या लग्नात नाचतात’, ‘उनसे -उमेदवार नसलेली सेना’ अशा बालिश प्रतिक्रिया स्वतः देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे देताना दिसत आहेत.
त्यात राज ठाकरे यांच्या राज्यभर १०-११ सभा अजून शिल्लक असल्याने भाजपच्या डोक्याला मोठा ताप झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंच्या झंझावातामुळे भाजपच्या आणि शिवसेनेच्या सभा फिक्या पडत असून, प्रसार माध्यमांच्या टीआरपी मधून देखील देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची रटाळ भाषणं झाकोळली गेल्याचे पाहायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पोकळ जाहिराती अजूनही लोकांच्या ध्यानात असल्याने भाजपने राज्यातील टेलिव्हिजन जाहिरातींचा सपाटा जवळपास बंद केला आहे. तर शिवसेनेच्या टेलिव्हिजन जाहिराती पाहून हसावं की रडावं तेच प्रेक्षकांना समजण्याच्या पलीकडील आहे. त्यात शिवसेनेचं नशीब म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे मागील ५ वर्षातील व्हिडिओ मतदाराला पुरावा दाखवत नाहीत, नाहीतर शिवसेनेची मोठी तारांबळ उडाली असती.
त्यामुळे पुढील १०-११ सभांमधून राज ठाकरे भाजप आणि शिवसेनेची किती लाख मतं कमी करणार ते पाहावं लागणार आहे. तसेच सध्याचं चित्र पाहता राज्यातील भाजप नेत्यांच्या टीकेवर राज ठाकरे वेळ वाया घालवतील असं अजिबात वाटत नसल्याने, जसजशा राज ठाकरेंच्या सभा होत जातील तसतशा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अडचणी वाढतच जाणार आहेत, असं सध्याचं वातावरण आहे.
