मुंबई : सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघाला असताना, शेतीत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यात अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या नोकरीच्या शोधात देखील भटकत आहेत. त्यात कमी शिक्षणाअभावी आणि पूर्व अनुभव नसल्यामुळे शहरांमध्ये नोकरी मिळणे देखील अतिशय कठीण असल्याचे अनुभव त्यांना येत आहेत.
त्याचाच फायदा घेऊन शहरांमध्ये अनेक गैरमार्गाने व्यवसाय करणाऱ्या आणि गरजूंना लुबाडणाऱ्या प्लेसमेंट कंपन्यांनी पैशाच्या मोबदल्यात नोकरी देण्याच्या उद्धेशाने स्वतःची दुकानं थाटली आहेत. तसाच काहीसा प्रकार मुंबईतील ड्रीम मॉल मध्ये ‘एसीइ रिक्रुटमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये सुरु होता. लातूरच्या एका शेतकरी कुटुंबातील दोघांकडून प्रत्येकी १,२७,००० उकळून त्यांना नोकरीचं आमिष देण्यात आलं. नोकरीच्या निमित्ताने त्यांनी लातूरवरून मुंबईला फेऱ्या मारण्यात आज पर्यंत जवळपास १५,००० रुपये खर्ची घातले आहेत आणि आशा एकच होतं की निदान एखादी नोकरी लागेल. परंतु शुद्ध फसवणूक झाल्याचे समजताच निदान पैसे तरी परत मिळावे यासाठी अनेक ठिकाणी हात जोडले परंतु काहीच फायदा झाला नाही.
संबंधित शेतकरी कुटुंबाने मनसेचे नितीन नांदगावकर यांच्याशी काही लोकांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क साधला. प्रत्यक्ष कंपनीला भेट देऊन नितीन नांदगावकरांनी विषय मार्गी लावत संबंधित शेतकरी कुटुंबीयांची जवळपास ३ लाखांपर्यंतची रक्कम अधिक लातूर’वरून आज पर्यंत प्रवासासाठी झालेल्या खर्चाचे १५ हजार रुपये देखील परत केले आहेत. त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी अजून एका कुटुंबाच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
