फतेहपूर सिक्री : भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी आणि देशाप्रती प्रेम असणारी मंडळी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर लोकसभा निवडणुकांच्या काळात केवळ पाकिस्तानविषयी नव्हे, ता भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे स्थानिक उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मार्गदर्शन केले.

प्रियांका यांनी महिला, युवक, शेतकरी आणि जवानांसाठी काय केले, आणि काय करणार आहेत, याबाबत भारतीय जनता पक्षाने सांगितले पाहिजे, असे सांगून तुमच्या दारात उघड्या पायांनी आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही का भेटला नाही, त्यांची दु:खे का समजून घेतली नाहीत, असा प्रश्न प्रियांका यांनी विचारला.

नरेंद्र मोदी सरकारला लोकशाहीबद्दल ना अभिमान आहे, ना जनतेबद्दल. ते खरे राष्ट्रवादी असते तर त्यांनी केवळ सत्याचा मार्ग अंगीकृत केला असता, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी हक्क व अधिकार मागितला, त्यांना मारहाण केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही अनेक मोठ्या योजना कार्यान्वित करु, ज्याचा सामान्य जनतेला अधिक फायदा होईल. काँग्रेसने नेहमी जनतेचाच फायदा पाहिला, त्यांना वाचवले आहे.

मोदीजी पाकबद्दल नाही तर भारताविषयी बोला : प्रियंका गांधी