मुंबई : कमला मिल मधील कालच्या अग्निकांडानंतर मुंबई महानगरपालिकेला पुन्हा जाग आली असून त्याचाच भाग म्हणून मुंबईतील सर्वच हॉटेल्स वर कारवाईचे आदेशच महापालिका आयुक्त अजोय मेहतांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
या कारवाईत मुंबईतील सर्वच हॉटेल्स, बार आणि पब्स चा समावेश आहे. परिक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या समावेश असलेल्या २४ जणांच्या विशेष टीम ची स्थापना करून, संबंधित हॉटेल्स ने अग्नीशमन, आपत्कालीन दरवाजे, हॉटेल्स चे अतिक्रमण अश्या विविध महत्वाच्या नियमांचे पालन केले आहेत कि नाही याची चौकशी करणार आहेत. पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित निकषांचा पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई पालिका आयुक्तांनी या टीम ला दिले आहेत.
या अग्निकांडा आधी केवळ मनसेच्या एका जागृत कार्यकर्त्याने हे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. ज्याकडे पालिका प्रशासनाने उडवाउडवीची उत्तर देत इतक्या गंभीर विषयाकडे कानाडोळा केला आणि त्यानंतर जे घडायचे ते घडले. परंतु आता घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही जागी झाली असून त्यांनी काल मोर्च्या काढून कमला मिल मधील काही पब्स जबरदस्तीने बंद करायला लावले. इतकंच न्हवे तर लोअर परळच्या काही भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही हॉटेल्स वर दादागिरी करायला सुरवात केली आहे.
कमला मिलच्या अग्निकांडणानंतर, संपूर्ण राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे यात काहीच शंका नाही.
