नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरु परिवारावर टीका करण्यात घालवतात. नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. परंतु, ५ वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीकरीमध्ये प्रियंकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. फतेहपूर सीकरीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी बोलत होत्या.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले तर ५० टक्के भाषण नेहरुंनी हे केल, इंदिरा गांधींनी ते केलं. परंतु भाजपाच्या ५ वर्षात सत्तेच्या काळात मोदी सरकारने काय केलं हे सांगत नाही असा टोला प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचार केला जात आहे. यूपीतील १३ जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान पार पडेल. यामध्ये खीरी, शाहजहापूर, हरदोई, कानपूर, कन्नोज यासारख्या मतदारसंघाचा समावेश आहे.
