नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी अतिशय गंभीर आरोप केले. ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करता येते, असा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर ईव्हीएम रशियातून नियंत्रित केलं जातं असा आरोप सुद्धा चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. तर फक्त पराभवाच्या भीतीनेच विरोधक हे आरोप करत असल्याचा पलटवार भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल शहा यांनी केला होता.
