नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बीएफएस’चे निलंबित जवान तेज बहादूर यादव यांची याचिका फेटाळली आहे. वाराणसीतील महाआघाडीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांची उमेदवारी रद्द झाली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले, आम्हाला या प्रकरणाची दखल घेण्यासाठी याचिकेत काही तथ्य आहे असे वाटत नाही. तर, तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले,’ ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे त्यामुळे १९ मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. तसेच उमेदवारी रद्द झाल्यानंतर आम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य संधी देण्यात आली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, वाराणसीमध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. तेज बहादूर यादव यांनी २९ एप्रिल रोजी समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र १९ एप्रिल २०१७ रोजी तेज बहादूर यांना बीएसएफमधून निलंबित केल्याचा आधार घेत १ मे या दिवशी रिटर्निंग ऑफिसकडून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. परंतु निवडणूक आयोगाकडे असे कोणतेही प्रमाण पत्र नाही की तेज बहादूर यांना भ्रष्टाचार किंवा राज्याच्या विरोधातील कोणत्या कृत्यामुळे काढण्यात आले. तेज बहादूर यांनी म्हटले आहे की, मी उमेदवारी अर्जासह निलंबित पत्रकही जोडले, ज्यात कारणही लिहिले होते.

तेज बहादूर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली