High Price of Vegetables | २०१४ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात भाजपने महागाईवरून आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे त्या आंदोलनात सध्याच्या मोदी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्रिपदावरील नेते गळ्यात भाज्या लटकवून आंदोलन करताना महागाईच्या मुद्द्यावरून तुटून पडले होते.

तसेच महागाईच्या मुद्द्याला मतदारांनी देखील साथ देत भाजपाला मोठ्या संख्येने मतदान करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं. मात्र त्यानंतर महागाई किती तरी पटीने वाढली आणि मोदी या मुद्दयावर कधीही बोलताना दिसत नाहीत. मात्र सर्व मतदार हिंदू-मुस्लिम मुद्दयांवर कसे केंद्रित राहतील यासाठी भाजपचे नेते आटापिटा करताना दिसतात.

देशातील कोणताही आणि काहीही संबंध नसलेला मुद्द्याला भाजप नेते हिंदू-मुस्लिम असं वळण देतात. म्हणजे २०१४ पूर्वी भाजपसाठी महागाईला काँग्रेस पक्ष जवाबदार होता. मात्र आता भाजपाला सत्तेत असल्यावर आणि सलग १० वर्ष सत्ता देऊनही महागाईसाठी थेट मुस्लिम जवाबदार असल्याचा हास्यास्पद साक्षात्कार झाला आहे. कोणी लहान नेत्याने नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मुख्यमंत्री असलेल्या नेत्याने हा आरोप केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्यातील भाज्यांच्या वाढत्या किमतींसाठी ‘मिया’ मुस्लीम समाजाला जबाबदार धरले आहे. ग्रामीण भागात भाज्यांचे दर कमी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, शहरांमध्ये किमती वाढतात. सर्व विक्रेते दरवाढ करत असून त्यातील बहुतांश मियाँ लोक असल्याचा दावा त्यांनी केला.

‘पूर्व बंगालचे मुस्लीम आसामी लोकांकडून जास्त दर आकारत आहेत. गुवाहाटीतील स्थानिक भाजी मंडईवर ‘मिया’ लोकांनी ताबा मिळवला आहे. जर एखादा आसामी तरुण भाजीपाला विकत असता तर तो इतर आसामी नागरिकांकडून वाढीव दर आकारू शकला नसता.

‘मुस्लिम भाजीविक्रेत्यांना हाकलून देईन’
आसामी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. मी तुम्हाला आश्वासन देतो की मी सर्व ‘मिया’ मुस्लिम भाजी विक्रेत्यांना शहराबाहेर फेकून देईन. आसाममध्ये कॅबपासून ते बससेवेपर्यंत बहुतांश लोक आता मुस्लीम समाजातील या वर्गातील आहेत.

कसं जोडलं कनेक्शन?
मिया मुस्लिम हे स्थलांतरित बंगाली मुस्लिमांचे वंशज आहेत जे २० व्या शतकात आसामच्या ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात ब्रह्मपुत्रा खोऱ्यात राहत होते. हे स्थलांतरित सध्याच्या बांगलादेशातील मैमनसिंग, रंगपूर आणि राजशाही विभागातून आले होते. मुख्यमंत्री हिमंत म्हणाले की, “आम्ही नुकत्याच ईदच्या दिवशी पाहिले आहे की गुवाहाटीमधील बहुतेक रस्ते रिकामे होते कारण ते सण साजरा करत होते.

आसाममधील महागाईमुळे सर्वसामान्य जनता चिंतेत
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक जण सरकारला प्रश्न विचारत आहेत. अशावेळी आता हिमंत बिस्वा सरमा यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण आले आहे. वास्तविक संपूर्ण भारतात भाज्यांचे दर गगनाला भिडले असून सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे आणि याचा ‘हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई’ असं काहीही संबंध नसून, महागाईची झालं सर्वच जाती-धर्माच्या लोकांना सोसावी लागत आहे.

News Title : Assam-Chief Minister Himanta Biswa Sarma says Miya Muslims responsible for surge in vegetable rates 14 July 2023.

मतदारांचा अवघड काळ? 2014 मध्ये मोदी महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, आता भाजप म्हणतंय ‘महागड्या भाज्यांसाठी मिया मुस्लिम जबाबदार’