नवी दिल्ली : काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. मोदी व शहा यांना जे हवे तेच मंत्रिमंडळात आले व जे नको ते बाहेर राहिले. मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा आता स्पष्ट झाला आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी वगळले तर ‘दिग्गज’ किंवा ‘हेवीवेट’ म्हणावेत असे फारसे कोणी दिसत नाहीत. पण अत्यंत महत्त्वाचे नाव आहे ते अमित शहा यांचे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे शिल्पकार अमित शहा आहेतच. त्यामुळे ते मंत्रिमंडळात येण्याविषयी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. भारतीय जनता पक्षावर शहा यांचे पूर्ण नियंत्रण आलेच आहे. आता मोदी यांच्या वतीने सरकारवरही त्यांचे नियंत्रण राहील असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

अमित शहा हे कोणते खाते स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास शहा यांचे नेतृत्व मिळतेय का हे पाहण्यासारखे आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय कश्मीरात ३७० कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल. समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अमित शहा यांची इच्छा होतीच.

शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे