नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधी सोहळ्यादरम्यान गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमकीचं पत्रं आलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील एक अशीच जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र यासाठी गंभीर आहे की, जर विषय इतका गंभीर असताना हजारो अतिथींना निमंत्रित करून इथल्या खुलेआम आणि शाही सोहळा घेण्याचा धोका सुरक्षा यंत्रणांनी कसा काय स्वीकारला हाच कळीचा मुद्दा आहे. विशेष खबरदारी म्हणून तो सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच विश्वासातील सहकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीत घेणं महत्वाचं होतं.
राजस्थानचे भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीवजा पत्रासंदर्भात खुलासा केला आहे. सैनी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आलं होतं. ज्यात मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या नावानं हे निनावी पत्र आलं होतं. त्यावर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत.
ही चिठ्ठी पाठवणाऱ्यानं आपलं नावंही दिलं होतं. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी म्हणाले, चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई केली हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी त्या आरोपींवर काय कारवाई केली याची माहिती घेऊन सांगेन, असंही सैनी म्हणाले आहेत.
मोदींना आलेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस आणि आयबीचे अधिकारी यासंदर्भात अधिक काही सांगण्यात तयार नाहीत. या प्रकरणात लवकरच तपास पूर्ण होईल आणि आरोपींना योग्य शिक्षा देऊ, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
