लखनऊ : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयासह बहुमताने मोदींचे भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आले. मात्र देशातील सर्वच विरोधी पक्ष आता त्यांच्या जुन्या रणनीतीत बदल करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी मायावतींच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान तब्बल २४ वर्षांनी दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशात लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आले होते. परंतु पराभवानंतर राज्यातील आगामी पोटनिवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढणार, अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसेवा मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.

त्यामुळे बसप-सप युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अखिलेश आणि डिंपल यादव यांच्यासोबतचं नातं कायम राहील. परंतु, राजकीय वाटचालीत स्वबळावर पुढे जाण्याचा निर्णय घेत असल्याचं मायावतींनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच कनौजमधून डिंपल, बदायूँमध्ये धर्मेंद्र यादव आणि फिरोजाबादमध्ये अक्षय यादव यांचा पराभव झाला त्यामुळे यादवांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातही यादवांची मते बहुजन समाजाच्या उमेदवारांना मिळाली नाहीत, असे म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली.

बसपा उत्तर प्रदेश पोटनिवडणुका स्वबळावर लढवणार