पुणे : मंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी ( १० जुलै ) प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थितांना संबोधत होते. त्यावेळी पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा मिळत नाही. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवित आहे. यात भ्रष्टाचार झाला अशा घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत दिल्या.
जोरदार घोषणाबाजीमुळे संबंधित ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान बैठकीत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण होताच पोलीसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रम पूढे पार पडला.
