मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना शिवसेना- भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर, आमचे खत चांगलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी अंधेरी मरोळ येथे पालिकेच्या मैदानात झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्यासोबत ११०० नागरिक एकाच वेळी एकाच ठिकाणी ११०० झाडं लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, आज मी लावलेले हे विकासाचे झाड पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगलं आहे. आधी पावसाचे आगमन होऊ दे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
