मुंबई :  मोदी सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत मांडलेले तिहेरी तलाक विधेयक या सभागृहामध्ये गुरुवारी ३०२ खासदारांनी पाठिंबा दिल्याने मंजूर झाले, तर विरोधात ७८ मते पडली. हे विधेयक आता राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल. या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांबरोबरच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) नेदेखील जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ जनता दल (यू)च्या खासदारांनी सभात्यागही केला.

केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही तशी शेकडो प्रकरणे देशात पुन्हा घडली आहेत. मुस्लिम महिलांचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आल्याचे ते म्हणाले. तिहेरी तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून त्यामुळे मुस्लीम महिलांचे नुकसान होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. या विधेयकाला एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (सं)ने विरोध केला. राजीव रंजन सिंह यांनी, या विधेयकामुळे विशिष्ट समाजामध्ये अविश्वास निर्माण होण्याची भीती असल्याचा दावा केला. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

नरेंद्र मोदी सरकारसाठी महत्त्वाचे असणारे तिहेरी तलाकबंदी विधेयक गुरुवारी १७ व्या लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी मंजूर झाले. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? असा सवाल आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी आपल्याला हुलकावणी देत आहेत. मात्र आपल्यावर त्यांचं थापेबाजीचं राजकारण थोपवण्याची जबाबदारी आहे. वंचितांना हलकेपणाची किंवा श्रेष्ठत्वाची भावना नेहमीच सत्तेपासून दूर ठेवत आली आहे. त्यामुळेच हलकेपणा आणि श्रेष्ठत्व सोडलं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान लोकसभेत मंजूर झालेल्या तीन तलाख विधेयकाला एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड विरोध केला होता . त्याआधी या विधेयकाबद्दल लोकसभेमध्ये बोलताना ओवेसी यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षावर सडकून टिका केली. मुस्लिम महिलांबद्दल तिहेरी तलाकच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारला ओवेसींनी चांगलेच सुनावले.

तिहेरी तलाक: मोदींचं सुद्धा लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? प्रकाश आंबेडकर