मुजफ्फरनगर : नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा कलम ३७० हटवल्यानंतर विवास्पद प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम सिंह सैनी यांनी सांगितले की, देशातील मुस्लिमांना या निर्णयामुळे आनंद व्हायला हवा कारण आता त्यांना न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करता येणार आहे. इतकचं नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अविवाहित युवा नेतेही काश्मीरला जाऊन प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असं विधान भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केले आहे.

मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रम सिंह सैनी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपाचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, विक्रम सैनी यांनी याआधीही बेजबाबदार वक्तव्य केले आहे. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. आपल्या देशाचे नाव हिंदुस्तान आहे, असं सांगत त्यांनी मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं तसेच गोमातेची हत्या करणाऱ्या लोकांचे हात-पाय तोडू अशी धमकी दिली होती. मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या विक्रम सैनी यांनी हिंदूंनी लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे असे सांगितले होते.

त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरकारकडून ‘हम दो, हमारा एक’ अशी घोषणा करण्यात आल्यानंतर हिंदू समाजातील अनेक जण इथेच अडकले. परंतु, आता हम दो, हमारे १८, हम ५, हमारे २५ असं म्हणण्याची वेळ आली आहे. हा देश सर्वांसाठी समान असेल तर कायदाही सर्वांसाठी समान असायला हवा. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाविषयी सर्वांना समान कायदा बनत नाही, तोपर्यंत हिंदू भावांनी थांबायचं नाही. कायदा बनेल तो सर्वांसाठी. तोपर्यंत थांबू नका, असं सांगत सैनी यांनी स्वतःचे उदाहरण दिले होते. दोन मुलं झाल्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली होती आता तिसरे नको. परंतु मी तिला म्हणालो अजून ४-५ होणार आहेत.

एका बाजूला सत्ताधारी ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अशा घोषणा देत असताना त्यांचे नेतेमंडळी मात्र त्याविरोधी प्रवाह निर्माण करत आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी दिल्या गेलेल्या घोषणा देखील धर्माशी जोडून विकृती पसरवत आहेत. त्यात आता कलम ३७० ला अनुसरून त्यांनी जे विधान केलं आहे, त्यावरून भाजपाच्या नेत्यांपासूनच बेटी बचाओ असं बोलण्याची वेळ आली आहे.

#VIDEO: आता भाजपच्या अविवाहित युवा नेत्यांना गोऱ्या काश्मिरी मुलीशी लग्न करता येणार: भाजपा आमदार