कोल्हापूर : पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कोल्हापूरचा महापूर ओसरण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली आहे. जवळपास तीन फूट पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.११ फूट असून आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे; परंतु कोल्हापूर, साता-यासह पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

पंचगंगा नदीची पातळी १ ते दीड फूट कमी झाली आहे. तरीही पुराचा धोका कायम आहे. कारण ही म्हणावी तितकी कमी घट नाही. दरम्यान शिरोळ तालुक्यातील आल्यास गावातले नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत आणि ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नौदलाने पुढकार घेतला आहे. सकाळी सहा वाजताच नौदलाची १४ पथकं या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्या दिशेने रवाना झाली आहेत. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. मात्र सांगलीत पावसाचा जोर ओसरला आहे.

दरम्यान, उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध आपण करुन देत आहोत, असे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पंचनामे झाल्यानंतर सरकार सगळी नुकसानभरपाई देईल. सरकार पूर्णपणे लोकांच्या पाठीशी असल्याचेही पाटील यांनी आश्वस्त केले आहे.

VIDEO: घरी होणार नाही अशी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत: चंद्रकांत पाटील