बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिला.

बीडमधील स्थानिक प्रश्नांना हात घातलल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली. तब्बल ५० कोटी रुपये मोजून त्यांनी मंत्रीपद मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी मोरगाव गटातील विजयाची आठवण सर्वांना करून दिली. जयदत्त क्षीरसागर ज्या गटातून केवळ ४० मतांनी निवडून आले. तेथून आपण १० हजार मतांनी विजयी झाल्याचं त्यांनी सांगितले.

हातातून घड्याळ काढून धनुष्य हाती घ्या, असे आवाहन शिवसेनेत प्रवेश करताना जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. याचा हवाला देत संदीप क्षीरसागर म्हणाले, अण्णा तुम्ही कार्यकर्त्यांना म्हणालात की घड्याळ काढून धनुष्यबाण हाती धरा. पण तुमचे वय आता ७५ झाले आहे. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या तुटतील. आम्हाला वानरसेना म्हणून हिणवता. तुमच्यासारख्या रावणाची लंका हीच वानरसेना जाळल्याशिवाय राहणार नाही, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत जाताच जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र, बीड जिल्ह्यातील या काका पुतण्यांचा राजकीय वाद पक्षांतरानंतर शिगेला पोहोचला आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपयात मंत्रिपद घेतले