रायगड : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

मुबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडील मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत. महाडजवळील वडपाले गावाजवळ चिपळूणला जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. अशात ही दुर्घटना घडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या. कोकण रेल्वेचे वेळापत्रकही सध्या विस्कळीत झाले आहे. सर्व गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल