नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोज नवनवीन कंपन्या बंद पडत असून अनेकांना रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका हा ऑटो आणि टेक्सटाईल उद्योगाला बसला आहे. देशभरात याची अजून तीव्र झळ बसलेली नसताना इतकी दयनीय अवस्था झाली असताना पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज येऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्राने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तब्बल पाऊणे दोन लाख कोटी घेणार असल्याची बातमी आली आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज सर्वांना आला आहे. मागील महिनाभरातच देशभरात लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि अनेक उद्योग बंद पडले आहेत. मात्र असं असलं तरी एकूण बातम्यांचा आढावा घेतल्यास इतर विषयांना अधिक महत्व देणाऱ्या बातम्या अधिक प्रमाणावर झळकताना दिसत आहेत. त्यात अनेक प्रसार माध्यमं देखील सरकारच्या दावणीला बांधली गेल्याची तक्रार विरोधकांनी सातत्याने केली आहे.

त्यामुळे आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोणतंही खोटं शंभर वेळा सांगितले तरी ते सत्य होत नाही. केंद्र सरकारला हे मान्य करावं लागेल की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी आली आहे, या मंदीतून सावरण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. मंदीचे वास्तव सगळ्यांना ठाऊक आहे. सरकार कधीपर्यंत हेडलाईन मॅनेजमेंट करून काम करणार? असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.

यापूर्वीही प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या वक्तव्य विरोधकांनी राजकारण करू नका या टीकेला प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, देशात मंदी आहे की नाही हे सरकार स्वीकारणार आहे का? अर्थमंत्र्यांनी राजकारणाशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेचं सत्य देशातील जनतेला सांगायला हवं. जर हेच सत्य अर्थमंत्री स्वीकारायला तयार नसतील तर सर्वात मोठी समस्येचं निरसन करणार? असा सवाल त्यांनी केला होता.

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकित केले होते. याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असे म्हटले होते. याला त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची घाईगडबडीत केलेली अंमलबजावणीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीचा) हा ५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

मोदीजी किती दिवस हेडलाईन मॅनेजमेंट करणार; लोकांना अर्थव्यवस्थेचं वास्तव सांगा: प्रियांका गांधी