मुंबई : सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी १५ दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची आज, गुरुवारी सांगता होणार आहे.

‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिक आज, गुरुवारी बाप्पाला निरोप देणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत, बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरीही हजेरी लावणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. १० दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

आज (गुरूवारी) दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे. मुंबईतील १२९ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केली; आज बाप्पाला निरोप देण्यात येणार