पुणे: काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केलीच होती. ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर आज काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ते इंदापूर मतदार संघातूनच भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? हा प्रश्न कायम आहे. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे; आमच्यासारख्या तत्त्वाने वागणाऱ्या माणसांसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं सांगतानाच मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलो असून भाजपशिवाय सध्याच्या काळात पर्याय नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत इंदापूरच्या जागेचा तिढा सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती.

हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश; इंदापूरमध्ये राष्ट्रवादीशी थेट लढत होणार