मुंबई: सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.

दरम्यान, आजच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी म्हटले की, ‘आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या आरेचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात सामान्य लोकांचा नक्की विरोधाचा मुद्दा काय आहे हे समजून घेणार आहोत. कारण, काही वेळेला पर्यावरण विषयक गंभीर प्रकरणात वैयक्तिकरित्या सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे असते, असं मत न्यायाधीशांनी नोंदवलं. आरे मेट्रो-कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयात एकूण ११३ याचिका दाखल झाल्या असून यावर आज एकत्रित सुनावणी पार पडली. आरेमधील २१८५ झाडे तोडण्यासाठी आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने याआधीच मंजुरी दिली आहे.

दरम्यान आज सकाळी अकराच्या सुमारास अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करत अनुभव सांगितला. त्यात त्यांनी म्हटलं, ‘माझ्या एका मित्राने मेडिकल इमर्जन्सीमुळे स्वतःच्या कारने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करणं पसंत केलं, परत आल्यावर तो मेट्रोच्या वेगवान, सुलभ आणि कार्यक्षमतेमुळे प्रभावित झाला, हे प्रदूषणावर उपाय..झाडे लावा…मी माझ्या बागेत केलं आहे….तुम्ही’.

वास्तविक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील मेट्रोच्या वेगवान, सुलभ आणि कार्यक्षमतेवर ट्विट केलं आहे आणि त्यात आरेच्या कारशेडचा काहीही संबंध नाही. तसेच हा प्रदूषणावर उपाय असल्याचं म्हटलं असून त्यासाठी झाडं लावा असं म्हटलं आहे, ‘झाडांची कत्तल करा’ असं म्हटलेलं नाही’. दरम्यान, आरेतील कारशेडला होत असलेला विरोध हा तेथील मोठ्या प्रमाणावर होणार असलेल्या आणि झालेल्या झाडांच्या कत्तलीमुळे आहे. विरोध करणाऱ्यांचा मेट्रोला किंवा विकासाला अजिबात विरोध नाही. तसेच याच आरेमध्ये शेकडो दुर्मिळ प्राणी आहेत, ज्यांचं अस्तित्व मेट्रो कारशेडमुळे नष्ट होण्याची भीती आहे. मात्र अश्विनी भिडे यांनी अमिताभ यांच्या ट्विटचा विपर्यास करून त्याचा शिस्तबद्ध संबंध मेट्रो३ संबंधित आरेतील कारशेडला जोडला आहे. आणि आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचा केविलवाणा प्रयत्न करत #AareyAikaNa अभियान सुरु केलं आहे.

अमिताभ यांचं प्रवास सुलभेतेवरून मेट्रोसंदर्भात ट्विट; अश्विनी भिडेंनी जोडलं ‘आरे ऐका ना’सोबत