मुंबई: सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.

दरम्यान, आजच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी म्हटले की, ‘आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या आरेचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात सामान्य लोकांचा नक्की विरोधाचा मुद्दा काय आहे हे समजून घेणार आहोत. कारण, काही वेळेला पर्यावरण विषयक गंभीर प्रकरणात वैयक्तिकरित्या सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे असते, असं मत न्यायाधीशांनी नोंदवलं.

आरे मेट्रो-कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयात एकूण ११३ याचिका दाखल झाल्या असून यावर आज एकत्रित सुनावणी पार पडली. आरेमधील २१८५ झाडे तोडण्यासाठी आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने याआधीच मंजुरी दिली आहे. परंतु, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी जोरु बथेना यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर मेट्रोचं कारशेड आरेमध्ये झालं नाही तर इतरत्र कुठेच होणार नाही आणि यासाठी हीच योग्य जागा असल्याचे मुंबई महापालिकेसह मेट्रो प्राधिकरणाच्या अध्यक्षा अश्विनी भिडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

आरेतील झाडांच्या कत्तलींना उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; न्यायाधीश आरेचा दौरा करणार