मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे या बँकेचे हजारो ग्राहक हवालदिल झाले असतानाच आमच्या बँकेत आर्थिक घोटाळा झालेलाच नाही, रिझर्व्ह बँकेने केलेली कारवाई ही अतिशय कठोर आहे, असा दावा या बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला.

पीएमसी बँकेने गेल्या सहा ते सात वर्षांत एनपीएचा (थकीत कर्जे) आकडा जाहीर केला नव्हता. मात्र रिझर्व्ह बँकेला आम्ही स्वत:हून माहिती दिली होती. एनपीएची माहिती जाहीर न करण्याचे कारण हे तांत्रिक होते. या कर्जांची वर्गवारी कशी करायची हे निश्चित न झाल्याने ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. एनपीएबाबतचा हा तांत्रिक घोळ निस्तरण्यासाठी आम्ही मुदतही मागितली होती,’ असे त्यांनी सांगितले.

पीएमसी बँकेतून एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल मला कोणतीच माहिती दिली गेली नाही. बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळातील काही व्यक्तींनी एचडीआयएलला दिलेल्या कर्जवाटपाच्या प्रक्रियेत सहा वर्षांपूर्वीच तांत्रिक फेरफार केल्यामुळे आरबीआयला याबद्दल खरी माहिती मिळाली नाही, असे पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी संगितले.

मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बँकेने खातेदारांची फसवणूक केली नसून, काही तांत्रिक गोष्टींमुळे आज बँकेवर आणि खातेदारांवर अशी परिस्थिती ओढावली आहे. बँकेने या परिस्थितीवर मात केली असती, परंतु आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांवर वाईट परिस्थिती ओढावली आहे. आरबीआयने घेतलेला निर्णय अत्यंत कठोर असून, तो बँक व खातेदारांवर अन्याय करणारा आहे, असे जॉय यांनी सांगितले.

HDIL’ला कर्ज देताना काही संचालकांनी ६ वर्षांपूर्वी तांत्रिक फेरफार केल्याने RBI’ला सत्य समजलं नाही