मुंबई: राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही, असं सांगतानाच तुमची परवानगी असेल तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार, असं सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून स्वत:ची उमेदवारी आज घोषित केली. या निमित्ताने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे. आदित्य यांनी त्यांची उमेदवारी घोषित केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याचे संकेतही शिवसेनेने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज वरळी येथे होत असलेल्या विजय संकल्प मेळाव्यात यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मी निवडणूक लढवणार, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी आपल्या सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारणात प्रवेश करत असल्याचे अधिकृतरित्या सांगितले. या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असून वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.
आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू देत असं यावेळी आदित्य ठाकरेंना सांगितलं.
