नागपूर: पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घर मै घूस कर मारुंगा… ‘, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः गेले होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक वरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली.
पुलवामा हल्ल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारबरोबर होते आणि सर्व मतभेद बाजूला ठेवून सरकारने बोलावलेल्या बैठकीत मी स्वत: उपस्थित होतो. परंतु लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्याच्या शौर्याचं राजकीय भांडवल केलं, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की, लढाई लढली सैन्याने मात्र मोदी यांनी निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि नंतरच्या एअर स्ट्राईकचं पुरेपूर भांडवल करून फायदा घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. उलट कलम 370 हटवायला कोणाचाच विरोध नव्हता, मात्र काही विरोधक ते कलम हटवताना तिथल्या लोकांना विश्वासात घ्या, संसदेच्या संयुक्त समितीकडे विषय देऊन सखोल चर्चा करा, असे म्हणत होते.
परंतु आपलं मत मांडणाऱ्या विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका केली गेली. शिवाय कलम 370 नंतर काश्मीरच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान यांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिक, कलावंत, विचारवंत लोकांना देशद्रोही ठरवले गेले.
