मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुमारे ९ कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. महिनाभर सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. गेल्या ४८ तासांत वैयक्तिक भेटी-गाठी व इतर संपर्क साधनांच्या माध्यमांतून मतांची बेगमी करण्यावर उमेदवारांनी भर दिला. काही ठिकाणी पैसेवाटपावरून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले.
राज्यात ७ ते ११ या चार तासांमध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागांमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत असून शहरी भागामध्ये मात्र कमी प्रमाणात मतदान होत असल्याचं चित्र दिसत आहे. तत्पूर्वी राज्यभरातून तब्बल ६५ ठिकाणी ईव्हिएममध्ये बिघाड झाल्याचं वृत्त असून या संदर्भात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
