अमरावती: राज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देवेंद्र भुयार यांना सकाळी साडेपाच वाजता गाडीतून खेचून मारहाण केली. त्यावेळी शहरातील काही लोक मॉर्निंग वॉकला आले होते. त्यावेळी आलेल्या लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून गाडी पेटवली.’
संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस इतके बेफीकीर का राहिले? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. या घटनेवर प्रतिक्रिया देणारा सदाभाऊ खोत यांचाही व्हिडीओ आला आहे. त्यात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे लोक स्टंटबाजी करणारे लोक आहेत. असं म्हंटलंय. मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत आहे. भुयार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांना उभय पक्षांकडून किती मदत मिळते, यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.
