मुंबई: राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.
५ वर्षांपूर्वी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.
दरम्यान, निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी तिढ्याचं मुख्य कारण आहे. आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच ‘आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,’ अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
