मुंबई: राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना भाजपमधील संवाद जवळपास बंद झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडून दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर शरसंधान साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. मात्र आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.
राज्यात सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेलं रणकंदन काही केल्या थांबताना दिसत नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी आणखी एक ट्विट करत भाजपला सूचक इशारा दिला आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करून “लक्ष्य तक पहुचने से पहेल सफर मे मजा आता है’, असा संदेश लिहीला आहे. राऊत यांनी ‘जय हिंद’ अशा मथळ्यासह हे ट्विट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
जय हिंद pic.twitter.com/AGfKbpVo0i
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 4, 2019
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यानुषंगाने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली दोन्ही बाजूने पुढे सरकल्या असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या तडकाफडकी मुंबईत दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
